परिचय

नाव : वसंत माधवराव मुंडे
जन्मस्थळ : लाडझरी ता.परळी जि.बीड
प्रदेशाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई.
शैक्षणिक पात्रता : बीएबीजे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र)
बीड जिल्हा प्रतिनिधी : दैनिक लोकसत्ता २००३ पासून कार्यरत.
अध्यक्ष : महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समिती २०१५.
जिल्हाध्यक्ष : बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ २००६.
प्रदेश कार्याध्यक्ष : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई २०१४ ते २०२०.

पुरस्कार

Vasant Munde red logo

ठळक नोंदी

वसंत मुंडेंचा ‘लोकल टू ग्लोबल’ प्रवास

पत्रकारिता म्हणजे अतिसामान्यांचा आवाज, सरकारपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम. हे समजून वसंत मुंडे नावाचा तरुण पत्रकारितेत आला आणि सामान्यांचे प्रश्‍न मांडता, मांडता वृत्तपत्र व पत्रकारांचेही प्रश्‍न मांडू लागला. वाचून आश्‍चर्य वाटेल, पण वसंत मुंडे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षांपासूनच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. विद्यार्थीदशेत असताना गावालगत रोजगार हमी योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरणाच्या कामावरील मजुरांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणुक करण्यात आली. हा भ्रष्टाचार तत्कालीन अंबाजोगाईतील लोकमतचे पत्रकार मोटेगावकर सरांना सांगुन मजुरांना न्याय मिळवून दिला. पुढे पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर तब्बल वीस वर्षांपासून पत्रकारीतेत कार्यरत आहेत. लेखणीतून वंचित, उपेक्षित वर्गासाठी काम करणार्‍या अनेक संस्थांना आर्थिक मदत उभी करून दिली. तर शेती, शिक्षण या विषयावर सकारात्मक व ऊर्जा निर्माण करणारे विपुल लिखाण केले. त्यातूनच तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बोलावलेल्या निवडक पन्नास पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेतही मुंडे यांची निवड झाली होती. ऊसतोडणी मजुराबरोबर राहून लिहिलेल्या लेखमालिकेला ‘समर्थ’ने शिष्यवृत्ती दिली तर अनेक पुरस्कारही मिळाले. उत्तम संवाद व बिनधास्तपणे मोजक्या शब्दात विषय मांडण्याची हातोटी हे त्यांचे वैशिष्ट्य.
लेखणीतून सामान्यांचे प्रश्‍न मांडताना सहकारी पत्रकारांच्या प्रश्‍नांचीही जाणीव झाली. समाजाचे प्रश्‍न मांडणार्‍यांच्या प्रश्‍नांकडे बर्‍याचदा डोळेझाक होते. राज्यकर्ते आणि समाजालाही पत्रकारांना काही प्रश्‍न असतील असे वाटत नाही. हे जाणवल्यानंतर मुंडे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून वार्ताहर आणि संपादकांचे प्रश्‍न मांडत ते सोडवण्याचे मार्गही सांगितले. शासनाच्या औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मुंडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यात शासकीय समितीची पत्रकारांबरोबर थेट ‘खुली चर्चा’ उपक्रम राबवला. त्यातूनच जाचक अटी शिथिल होऊन अधिस्वीकृती पत्रिका मिळण्याचा मार्ग सोपा झाला. शहरापासून गाव पातळीपर्यंतच्या पत्रकारांचे प्रश्‍न मांडून ते सोडवले जात असल्याने याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई च्या राज्य अध्यक्षपदी वसंत मुंडे यांची एकमताने निवड झाल्यानंतर तब्बल सतरा हजारांपेक्षा अधिक पत्रकार सदस्य असलेल्या संघटनेला लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक पध्दतीचा वापर केला. समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे अडचणीत असलेला वृत्तपत्र व्यवसाय कोरोनामुळे अधिकच डबघाईला आला. जाहिरातीचा ओघ कमी झाल्याने साखळी वृत्तपत्रासह छोट्याही वृत्तपत्रांचे आर्थिक गणित बिघडले. उत्पादन खर्चाच्या तीस टक्के विक्री किंमतीत घरपोहोच वृत्तपत्र देण्याचे पारंपारीक धोरण बदलले पाहिजे यासाठी औरंगाबाद येथे संपादकांची पहिली गोलमेज परिषद घेऊन वृत्तपत्रांनी आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी विक्री वाढवण्याचे आवाहन केले. वृतपत्र मालक, संपादक, वितरक यांना विविध माध्यमांमधून विक्री किंमत वाढवण्याचे गणित पटवून दिले. लोकपत्रकार भागवत तावरे यांनी शब्दबद्ध केलेली वसंत मुंडे यांची ‘वृत्तपत्रांचे अर्थकारण’ या विषयावरील मुलाखत राज्यातील तब्बल तीनशेपेक्षा अधिक वृत्तपत्रांनी प्रकाशित करुन समर्थन केले. परिणामी राज्यातील चारशे पेक्षा अधिक दैनिकांनी विक्री किंमत वाढवली. एका पत्रकाराची एकच मुलाखत विविध दैनिकांत प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ‘मुंडेंचे नेतृत्व सर्वमान्य’ झाले. वृत्तपत्र व्यवसायाला ऊर्जित करण्यासाठी केंद्र सरकारने करदात्यांना वृत्तपत्र खरेदीवर उत्पन्नकरात वार्षिक पाच हजारांची सवलत द्यावी, अशी मागणी श्री. वसंत मुंडे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे.
वर्षानुवर्ष सरकारकडे मागण्या करून काय साध्य झाले? याचा विचार करुन माध्यमातील लोकांनीच सक्षम झाले पाहिजे अशी भूमिका केवळ मांडली नाही तर पत्रकार संघाच्या माध्यमातून नवीन पायंडे सुरू केले. करोना काळात २८ जिल्ह्यातील पत्रकारांशी वेब संवाद करुन लोकसहभागातून पत्रकारांना किराणा साहित्यासह मदत मिळवून दिली. पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या. तर एकाच दिवशी राज्यभर ‘रक्तदान’ शिबिर घेऊन सोळाशे बॅग रक्त संकलन करुन देण्याचा विक्रम नोंदवला. समाज माध्यमाच्या मोहजालातही संवाद कायम रहावा यासाठी औरंगाबाद विभागीय कार्यालयात वार्तालाप तर बीड येथे चार वर्ष मासिक व्याख्यानमाला चालवली. परिणामी राज्यभरात संघाच्या माध्यमातून वार्तालाप घेतले जात आहेत. दिवाळीत स्नेहमिलन तर रमजान ईद मिलन कार्यक्रम घेऊन संघाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. मयत पत्रकारांच्या कुटुंबीयांना लोकसहभागातून मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय उपचारांसाठीही संघाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. अशा नवीन उपक्रमातून संघटना आणि वृत्तपत्रक्षेत्रात नव्या परंपरा पुढे आणत या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी मुंडे यांनी आश्‍वासक वातावरण निर्माण केले आहे. वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या यावर राज्यभर सात विभागीय अधिवेशनात चर्चासत्र घेऊन जागृतीची चळवळच उभी केली. ‘बुके ऐवजी बुक’ हा उपक्रम राबवला. तर परिस्थितीशी संघर्ष करत चांगले उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना शोधून त्यांच्या ‘यशोगाथा’ प्रसिद्ध केल्या त्यातून ‘शब्दशिवार’ नावाचे पुस्तक आकाराला आले. ज्येष्ठ पत्रकार स.मा.गर्गे यांच्या नावाने राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराच्या माध्यमातून दिग्गज पत्रकारांचा सन्मान आणि राजकीय क्षेत्रातला सार्वजनिक मोकळापणा वाढावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीच्या कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन केले. तर राज्यभर पत्रकार संघाच्या माध्यमातून देहदान, नेत्रदान नोंदणी अभियान राबवून विक्रमी नोंदणी केली. शासनाच्या योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढावा यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गाव दत्तक घेऊन ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान यात पुढाकार घेतला. बदलत्या काळानुसार डिजीटल मिडीयाचा प्रभावीपणे वापर करतात यावा यासाठी आता एवन कम्युनिकेशन मिडीयाची स्थापना करुन भारतात पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनल्स आणि डिजीटल मिडीयांना एकत्र करुन अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्योगाचीही उभारणी केली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या क्षमतांच योग्य पध्दतीने वापर करुन अडचणीच्या काळात समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी शोधक बातम्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार. ऊसतोड मजुरांच्या समस्येवर लिखानासाठी समर्थन संस्थेची शिष्यवृत्ती. कळंब तालुका पत्रकार संघाचा मोहेकर गुरुजी राज्यस्तरीय पुरस्कार, अहमदपुरचा डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज पुरस्कार, पंतप्रधानांच्या परिषदेसाठी निवड आणि आता लोकमत मिडीया ग्रुपचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम अवॉर्ड मिळाला आहे.

सोशल मीडिया