पत्रकार संवाद यात्रा

“लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी” हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी- नागपूर ते मंत्रालय-मुंबई अशी राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला २८ जुलै २०२४ला प्रारंभ झाला.

संपूर्ण राज्यभर सर्वाधिक सदस्य संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई ही एकमेव संघटना आहे. या संघटनेचे सक्षम नेतृत्व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रा आयोजित केली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागपूरच्या दीक्षाभूमी येथून या पत्रकार संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याला २८ जुलै रोजी प्रारंभ झाला.

नागपूरच्या दीक्षाभूमीवर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाने पत्रकार संवाद यात्रेला २८ जुलैला सुरुवात झाली . त्यानंतर वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, मुक्ताईनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पहिल्या टप्प्याचा समारोप शिर्डी येथे झाला. दुसरा टप्पा १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथून होईल आणि २० ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे समारोप झाला. या यात्रेत एकूण २७ जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि १५० पेक्षा अधिक तालुक्यांमधून साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करून राज्यभरातील पत्रकार, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे जेष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी संवाद झाला.

पत्रकार हा खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. तो समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी २४ तास उपलब्ध असणाऱ्या पत्रकारांचेही प्रश्न असतात याची जाणीवच राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना नाही. या सर्व बाबींचा संवाद यात्रेत उहापोह झाला.

प्रमुख मागण्या

केंद्र सरकारकडे पाठविण्याचे प्रस्ताव :
१) केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना (डिजीटलसह) उत्पन्न करात वार्षिक ५००० सूट द्यावी. असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा.
२) सरकारने वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींवरील ५ % जीएसटी कर रद्द करावा. यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव द्यावा.

 राज्य स्तरावरील मागण्या :
१) वृत्तपत्र व माध्यमसमूहांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
२) माध्यम क्षेत्रासाठी स्वतंत्र स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करावे.
३) विधानपरिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यत्वासाठी पत्रकारांमधून निवड करावी.

 गृह विभाग स्तरावरील मागणी :
१) पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला आहे, मात्र स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होत नाही. त्यासाठी पोलिस प्रशासनाला आदेश द्यावेत.
२) अलीकडे बातमी प्रसिद्ध किंवा दाखवण्यात आली की थेट पोलिस ठाण्यात पत्रकारांविरूध्द गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रसिद्ध बातमीबाबत पत्रकाराविरुद्ध तक्रार आल्यास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करूनच गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी. यासाठी पोलिस विभागाला निर्देश द्यावेत.

 ग्रामविकास विभाग स्तरावरील मागणी :
१) महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यात गाव तिथे ग्रंथालय धोरणाअंतर्गत स्थानिक वृत्तपत्र खरेदीसाठी १० हजार रुपये तरतूद करावी यासाठी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढावा.
२) स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील शासकीय समित्यांवर पत्रकारांमधून एक प्रतिनिधी घ्यावा.
३) शासकीय, निमशासकीय शाळा महाविद्यालयांमध्ये वर्तमानपत्र खरेदीसाठी तरतूद करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाकडील मागण्या :
१) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सलग तीस वर्षे सेवेची अट शिथील करून प्रक्रिया सुलभ करावी. तसेच दाखल झालेले प्रस्ताव सहा महिन्याच्या मर्यादेत निकाली काढून पेन्शन सुरू करावी. सध्या तीन वर्षे झाले तरी प्रस्ताव मंजूर होत नाहीत.
२) अधिस्वीकृती पत्रिका ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळावी यासाठी वेतन चिठ्ठीची अट रद्द करावी. कारण बहुतांशी पत्रकार मानधनावर काम करतात. संपादकांच्या शिफारशीनुसार जिल्हा दैनिकांच्या तालुका वार्ताहरांनाही अधिस्वीकृती देणेबाबत प्रक्रिया सुलभ करावी.
३) अधिस्वीकृती मंजूर करताना दुय्यम व्यवसाय नसल्याचे प्रतिज्ञापत्र देण्याची अट रद्द करावी.
४) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुर्वीप्रमाणे रेल्वेत ५० टक्के आरक्षण आणि स्लीपर कोच बस, विमान प्रवासात सवलत द्यावी.
५) सरकारने घोषणा केल्याप्रमाणे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांच्या वाहनांना महामार्गावर टोलमाफीसाठी स्वतंत्र आदेश द्यावेत.
६) २०१८ च्या शासन धोरणानुसार जाहिरातींच्या दरात दर दोन वर्षांनी नियमितपणे वाढ करावी.
७) शासकीय पुरस्कार दरवर्षी दर्पण दिनी वितरीत करावे यामध्ये तीन वर्षापासून खंड पडला आहे.
८) शासकीय जाहिरातीचे वितरण करताना स्थानिक पातळीवरील जिल्हा दैनिके, साप्ताहिके यांच्यावर वर्गवारीच्या नावाखाली होणारा अन्याय थांबवावा. समान न्यायाच्या धोरणाने वितरण व्हावे. तसेच महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक दैनिके व साप्ताहिकांना प्राधान्याने जाहिरात द्यावी. वर्षातून चार दर्शनी जाहिराती पुन्हा नव्याने सुरू करण्यात याव्यात.
९) कोरोना काळात वृत्तपत्रांच्या खपावर परिणाम झाला असल्याने द्विवार्षिक पडताळणीत खपाबाबतचे नव्याने धोरण निर्माण करावे. तसेच शासन यादीवर येण्यासाठी एक हजार अंक खपाची मर्यादा करावी.
१०) दरवर्षी माध्यम संस्थेकडून पत्रकारांची यादी घेवून पत्रकारांची अधिकृत गणना करून शासकीय लाभ देण्याचा निर्णय घ्यावा.
११) वीस वर्षे पूर्ण केलेल्या नियमित दैनिके व साप्ताहिके यांना द्विवार्षिक पडताळणीतून वगळावे.
१२) अधिस्वीकृती समिती राज्य आणि विभाग स्तरावर कामगार कायदा (लेबर युनियन अॅक्ट १९२६) अंतर्गत नोंद असलेल्या संघटनांना प्रतिनिधित्व द्यावे.
१३) मुंबईप्रमाणे म्हाडा अंतर्गत शासकीय जमीन म्हाडाला देऊन जिल्हा व तालुका स्तरावर पत्रकारांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प राबवावा.
१४) जुनी वर्तमानपत्रे ही मूल्यवान ठेवा असल्याने ऐतिहासिक घटना जतन करण्यासाठी त्यांना संगणीकृत करण्यासाठी विशेष सवलत द्यावी.
१५) डिजिटल मिडियाला (न्युज पोर्टल, युट्यूब चॅनेल) निकष ठरवून शासनमान्यता द्यावी.
१६) जिल्हा, तालुका पातळीवरील प्रमुख शासकीय कार्यालयात पत्रकार कक्ष स्थापन करावा.
१७) माध्यम समूहाकडून नाममात्र मानधन मिळत असल्याने सलग पाच वर्षे सेवा केलेल्या पत्रकारांना शासनाने दरमहा मानधन योजना सुरू करावी.

डिजिटल कव्हरेज

प्रिंट मीडिया कव्हरेज

डाउनलोड

पत्रकार सवांद यात्रेचे दस्तऐवज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी इमेजवर क्लिक करा.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील “एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम ” पुरस्कार मिळाल्याने हितचिंतक, मित्र यांच्य्या सद्दिच्छा जणूकाही पुरचं आला. कित्येकांनी वसंत मुंडे याना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दुबईतील पुरस्कार सोहळ्यातील काही आणि शुभेच्छा देणाऱ्या मित्रासोबतचे काही क्षण इथे कॅमेऱ्यात टिपून मांडले आहेत.

पत्रकारांचा नायक...!

लोकसत्ताच्या माध्यमातून 20 वर्षांपासून रचनात्मक पत्रकारिता करणारे श्री.वसंत मुंडे आता नव्या भूमिकेत महाराष्ट्रासमोर आले आहेत. कदाचित हा मुंडे या नावाचा महिमा. या नावात उपजत नेतृत्वगुण असल्याने त्यांच्याकडे लिडरशीप असल्याचे पहायला मिळते. वसंत मुंडे यांचा पत्रकारितेतील प्रवास अनेक अनुभवांनी संपन्न आहे. त्यांचा जन्म एका खेड्यातला असल्याने, ग्रामीण संस्कृतीचा बाज त्यांच्या व्यक्तीमत्वामध्ये दिसून येतो. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मुंडेचा नकळतपणे पत्रकारितेशी संपर्क आला. पत्रकार होणे त्यांचे ध्येय नव्हते. परंतु व्यक्तीचे कर्म विधीलिखित असल्यामुळे आज ते पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्षम नेतृत्व करत आहेत. त्यांची पत्रकारिता नावाप्रमाणे बहरत गेली. 
बीड जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकारीता करत असताना मुंडे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले आणि अल्पावधीत सीमोल्लंघन करुन त्यांनी राज्य पत्रकार संघात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. लेखणीच्या माध्यमातून आपण समाजाला न्याय देवू शकतो हे सिध्द करत असताना मूळ शेतकरीपुत्र असल्याने त्यांनी शेतीच्या विषयावर बख्खळ लिखाण केले. अनेक सामाजिक संस्थांना लोकसत्ताच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ उभा करुन दिले. जिल्ह्याच्या सामाजिक जडणघडणीत वसंत मुंडे यांच्या लेखणीचे सर्वोच्च योगदान राहिले आहे. पण समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या लेखणीचे प्रश्न मात्र उपेक्षित आहेत हे लक्षात घेऊन परिवर्तनाचे वारे त्यांच्या मनात वाहिले. शिवाणकाम करणाऱ्या सुईला आयुष्यभर स्वत:चे वस्त्र मिळत नाही. तशीच अवस्था लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची झाली असल्याने या पत्रकारांना आत्मभान देण्याचे काम त्यांनी सुरु केले.
कवि अनंत सुतनासे यांनी पत्रकारीतेची वेदना मांडताना असे म्हटले आहे की,
‘चल भेदु तिमिराला,हाती मशाल घे,लेखणीला साथ दे ॥धृ॥
मांडले वैफल्य किती,फोडल्या वाचा किती,
त्याच्याच याचनेला,एकदा तू साद दे ॥1॥
ही लढाई खऱ्याची तुझ्या माझ्या घराची,
संवादाच्या वाटेवरती हातात हात दे ॥2॥
जनांचेच मी दर्पण केलेली मला अर्पण,
मी पाईक आजचा तु उद्याची बात दे
लेखणीला साथ दे ॥3॥
या शब्दरचने प्रमाणे उपेक्षीत राहिलेल्या लेखणीला साथ देण्याची साद घालून संवादाची प्रक्रीया गतीमान करुन राज्यात पत्रकारांची एक विधायक चळवळ उभी केली. ही चळवळ म्हणजे गरजवंत पत्रकारांचा एक लढाच…! पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मुंडेंनी घर सोडले आणि संपुर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला.
महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष असताना मुंडे यांनी  प्रत्येक जिल्ह्यात खुली चर्चा  उपक्रम राबवत संवादाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. प्रशासनाला सोबत घेवून मुंडे थेट पत्रकारांच्या दारी पोहचले. ज्येष्ठ पत्रकारांना घरपोहोच अधिस्वीकृती देण्याचा तसेच जिल्हा दैनिकाच्या तालूका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना योजनेचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. संधी मिळते तेव्हा त्याचा उपयोग इतरांसाठी जो करतो तोच खरा नेता असतो. वसंत मुंडे यांना पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करताना जी संधी मिळाली त्याचा प्रामाणिकपणे इतरांसाठी करुन देण्यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी सर्व विभागात वृत्तपत्राचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या यावर स्वतंत्र अधिवेशने घेतली. कोरोना महामारीत वृत्तपत्र उद्योग कोलमडून पडला. या आपत्तीतून इष्टापत्ती शोधण्याचे काम वसंत मुंडे यांनी केले. वृत्तपत्र व्यवसायावर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल असल्याने मानवविकास निर्देशांक वाढीस याचा थेट संबंध आहे. म्हणून वृत्तपत्र खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयकरामध्ये 5 हजार रु.सवलत द्यावी अशी मागरी वसंत मुंडे यांनी सरकारकडे केली. महाराष्ट्रातील सर्व राजकिय पक्षांनी या सूचनेचे स्वागत केले. केंद्रात अर्थ राज्यमंत्री असताना डॉ.भागवत कराड यांनी सुध्दा ही कल्पना खूप परिणामकारक ठरेल असे सांगितले. या मागणीची अंमलबजावणी होईल तो दिवस खऱ्या अर्थाने वृत्तपत्रांसाठी आर्थिक स्वातंत्र्यदिन असेल.
 
वृत्तपत्र व पत्रकारांसाठी शाश्वत आणि दुरगामी योजनांचा आग्रह धरुन राज्यभर एक मोठी चळवळ उभी करत असताना वसंत मुंडे यांनी 28 जुलै 2024 रोजी आणखी एक क्रांतिकारक पाऊल टाकले. यापूर्वी कधीच कोणाच्या लक्षातही आले नाही असा विषय समोर आणला. दीक्षाभुमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढून मुंडेंनी संपूर्ण राज्याचे लक्ष एका दिशेने वळवले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर घटनाकार आहेत त्यापूर्वी ते पत्रकार होते. अशा महामानवाच्या दिक्षाभूमीवर वंदन करुन पत्रकारांसाठी एक ऐतिहासिक जागर सुरु केला. 24 दिवसांच्या यात्रेला मिळालेला प्रतिसाद न भुतो न भविष्यती असाच. गरजवंत पत्रकार रस्त्यावर उतरले. परिवर्तनाची एक नवी लढाई या माध्यमातून सुरु झाली. पत्रकारांचा नायक म्हणून महाराष्ट्राने आता वसंत मुंडे या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. येणाऱ्या काळात पत्रकारांचा हा आवाज आणखी बुलंद होत राहिल.
 
– संतोष मानूरकर